Sunday, September 8, 2013

माझंही एक मेघदूत..

वैदेहीस...
आठवतं तुला..? तू काही क्षण दूर गेलीस..अन् माझं मन आवेगी झालं..कागदावरची रेषा त्याच आवेगानं जन्मास आली..विलक्षण गतीनं...जी कागद सोडून बाहेर जाऊन परतली.कागदावर ऊतरली खरी पण नंतरचा प्रवास थांबलाच जणू तिचा..
शेवटी मी बाहेर पाहिलं..आसमंतीच्या एका मेघास गुंफून घेऊन ती परतली होती.अन् म्हणून त्या मेघाचाही प्रवास थांबलेला..मी रेषेस सोडवून घेतलं..मेघास जायला सांगितलं.पण तो थांबला..म्हणला;."हा बंध बांधला गेला त्याला कारण असावं;काय घडलंय सांग मला.."अन् मी त्याला सारं सांगितलं..मन भरुन येत गेलं त्याचंही.!
म्हणाला;" माझ्यावर चित्रं रंगव..किंवा..लिही एखादा निरोप तिच्यासाठी.!"मी मौन होतो ऊदास होतो..तुझ्यासाठीच्या भावनाही अव्यक्त होत्या.म्हणून मी त्याच्यावर एक 'स्वल्पविराम' लिहीला...तो निघून गेला...
तुझा प्रदेश त्याला लागला..तू मेघ पाहिलास..क्षणभर प्रश्नचिन्ह दाटलं तुझ्या चेहेर्यावर..मग चेहरा निवळला तुझा.तू मेघास विचारलंस."मेघा तू अल्प;स्वल्पसा विश्राम कुठे केलास.?त्या चित्रकाराकडं तर नव्हे.?इतर मेघ तसेेच परतले कोरे.मात्र तुझ्यावर स्वल्पविराम आहे..!"
मेघास कळले हाच पूर्णविराम आपल्या प्रवासाचा..त्यानं तुला चिंब भिजविले..व तो रिता झाला..अन्
तू त्या वेळी मात्र माझ्या मनातल्या वियोगाचा आर्त सागर पेललास.....!!
मी तुझा कसा ऊतराई होऊ.?कारण तू धावत आलीस..कवितेमधून नांदू लागलीस....

1 comment:

  1. मेघदुतास याहून कुणी जाणले असेल असे वाटत नाही. म्हणून तर तो मेघही तुम्हाला फितूर झाला

    ReplyDelete